दोन दिवस weekend म्हणून बाहेर गेले होते. अर्थातच रोजच्या रूटीन मधून सुट्टी मिळाली होती. त्यामुळे सगळच निवांत चाललं होत माझं. त्यात ना मी wats app बघत होते , ना fb, ना instagram…TV पासूनही दूरचं होते…
आता social media पासून दूर म्हणजेच जगापासून अगदी अज्ञातात गेल्यासारखच आहे. काही गोष्टी इतक्या अंगवळणी पडल्या आहेत की आपल्या आजुबाजूला काय चालू आहे याची खबरबात लागली नाही की अगदी चुकल्यासारखं होतं.
त्यात आज सोमवार म्हणजे अगदीच गडबडीचा दिवस. तरीही सकाळी सकाळी मी TV लावलाच. माझी बोटं सराईतपणे रिमोटवरून फिरायला लागली आणि स्थिरावली ती एका न्यूज चॅनेल वर.,. मग एकावरून दुसरा न्यूज चॅनेल आणि मग तिसरा….
हे न्यूज चॅनल्स म्हणजे खरं तरं जगाच्या दुसऱ्या टोकाला काय चालू आहे याची माहिती देणार साधन आहे . पण आजकालच्या स्पर्धात्मक युगात हे चॅनल्स तरी कसे मागे राहतील?
कुठलाही बातम्यांचा चॅनेल लावा तिथे कुठलीतरी अतिरंजीत बातमी चालू असते. बातम्या सांगणारा तो किंवा ती अगदी तन्मयतेने अचूक वेध घेतल्याप्रमाणे नाट्यमरित्या ती बातमी सांगत असतात. स्क्रीनवर एकच एक दृश्य सतत फिरत असतं. बातमीदार शब्दांचे खेळ करतं असतो आणि आपल्यासारखा प्रेक्षक अगदी थिजून जाऊन ती बातमी मन लावून पहात आणि ऐकत असतो. आता समोर चाललेलं पाहण्याचं काम डोळे करत असतात तर ऐकायचं काम अर्थातच कान…. पण त्याच वेळी या sensory organs ना कंट्रोल करणारा ” मेंदू “नावाचा राजा काय करत असतो कोण जाणे?
बातम्या खरतर वाचण्याची किंवा ऐकण्याची कृती आहे. वर्षानुवर्षे हे काम वर्तमानपत्र आणि रेडिओ यांनी चोखपणे बजावलं. त्यानंतर आलेल्या TV ने सुद्धा आपल्यापर्यंत जग पोचविण्याचे काम खूप जोखमीने आणि इमानेइतबारे केलं. अगदी गेल्या 10 वर्षांपर्यंत बातम्यांची व्याप्ती खूप कमी होती. पण त्यानंतर आलेल्या social media या टेक्नॉलॉजीने सगळंच बदलून टाकलं. त्यात news किंवा बातम्या हे क्षेत्र सुद्धा मागं राहील नाही. किंबहुना याचं क्षेत्रानं सर्वात जास्त बाळसं धरलं आहे.
समाज घडविण्याचं काम करणारा हा विभाग आज मात्र समाज बिघडण्याचा सर्वात मोठा भाग बनला आहे.
कुठल्या बातमीला किती महत्व द्याव याला काही मोजमाप उरलेलच नाही. खऱ्या – खोट्याचा बाजार या चॅनेल्स मधून अगदी व्यवस्थितरित्या मांडला जातोय. समाजाची बिघडत चाललेली मानसिकता या चॅनेल वाल्यांच्या गावी सुद्धा नाहीये. याचं लक्ष आहे ते फक्त TRP कडे.
वाईट वाटत…खूप वाईट वाटत जेंव्हा प्रगतीच्या शिखराकडे जाणाऱ्या आपल्या देशात या न्यूज चॅनेलवाल्यांचा चाललेला हा नंगा नाच बघून. असं वाटत की या देशात काही चांगलं घडतच नाहीये का?
सगळीकडे बातम्या असतात त्या फक्त सूड, राजकारण, आंदोलने, जाळपोळ, एक्सिडेंट्स, खून, चोऱ्या, बलात्कार, फसवाफसवी, ……. बस संपलं. बाकी काही नाही???
विचार करून मन अगदी सुन्न झालं. इतका सुजलाम, सुफलाम माझा देश …त्याची प्रतिमा जगभर काय होते आहे? एकीकडे उच्च शिक्षण, अद्यावत टेक्नॉलॉजी, सुंदर पर्यटन, विज्ञान, खेळ , अशा अनेक विविध क्षेत्रात झेप घेणाऱ्या देशाला चांगला समाज घडविणाऱ्या बातम्यांची वानवा पडावी इतके वाईट दिवस खरच आलेत?
विचार केला पाहिजे अगदी प्रत्येकाने याचा विचार केला पाहिजे…काय पोचवतो आहोत आम्ही पुढच्या पिढीकडे आणि पुढच्या पिढीपर्यंत…????
डॉ मधुरिमा कुलकर्णी