गौरीच्या आगमनाचा दिवस जवळ यायला लागला. तशी तयारी करायला सुरुवात केली .काम करत होते. आणि एकदम गौरीमायच समोर आली.
तिला बघुन अपार आनंद झाला.
अगं आई आत्ता कशी आलीस?
ये इथं. जरा बस माझ्याजवळ. तुझ्याशी जरा बोलायचं आहे .मला जवळ बसवून गौरीमायनी बोलायला सुरुवात केली.
लेकरा माझ्या येण्याची तयारी सुरू केलीस म्हणून आधीच तुला भेटायला आले ……मी येणार म्हणून तुला काय करू काय नाही असं होतं…
त्याचं मला समाधान वाटतं…
पण खूप काम करून दमून नको जाऊस…..सण साजरा करताना त्यातला आनंद घ्यायला शिक.
आता लेकी बाळी नोकरी करणाऱ्या आहेत.त्या दिवसभर काम करत राबत असतात….. तेव्हा लक्ष्मी घरात येते……त्याचं घराची खरी लक्ष्मी आहेत हे विसरू नकोस…त्यांना समाधानात ठेव. त्या आनंदात असतील तर घर सुखात असतं…
उगीच स्वतःचा मोठेपणा दाखवायला जाऊ नकोस. हे केलंच पाहिजे.. ते केलंच पाहिजे… असं म्हणत बसू नकोस .त्यांनी काही बदल सुचवला तर बदल कर ..
आणि बदल करताना मनात भीती नको ग ठेवूस… माझ्यावर प्रेम करतेस ना मग मला भ्यायचं कशाला ? ……
आणि आईला कोणी कधी भितं का?
आपल्या घराण्यात अशीच परंपरा आहे ….आपल्यात अशीच रीत आहे……सासुबाई अशाच करायच्या….वगैरे… पालुपद तर आजीबात लावू नकोस….
अजून एक सांगते ते नीट ऐक.
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात खाणारी माणसं होती .आता तसे नाहीये हे लक्षात घे.
माझ्यासाठी हे करतेस ना..
तर मग माझ्या मनातल एक खरं सांगू …
मला हे काही नको असतं ग…
आल्या दिवशी तू केलेल्या भाजी भाकरीवर मी तृप्त असते बघ..
घरोघरी जाऊन तुम्ही सर्वजण कसे आहात ?सुखात आहातना….
हे मला बघायचं असतं.
तुमच्याशी बोलायचं असतं..
मायेनी प्रेमानी त्या ओढीनी मी येत असते ग….
घडीभर माझ्याजवळ नुसती बसत जा …..मनातलं सांगत जा …मलाही तुझ्याकडे प्रेमानी बघायच असतं….
सजावटीच्या गडबडीत तुझा पहिला दिवस जातो .दुसऱ्या दिवशी जेवणाची गडबड..
हो आणि जेवणाच …आता मी सांगते तसचं कर.
करायलाच हव्यात म्हणून भाज्या, कोशिंबिरी ,भजी ,वडे ,पाच गोड पदार्थ, चार चार भातांचे प्रकार ,सगळं करतेस संपत नाही ग सगळं….. तुझं हे सगळं होईपर्यंत घरातले सगळे भुकेजून जातात .दोन दोन ..वाजेपर्यंत तुझा स्वयंपाक चालूच असतो.ह्याचा पण विचार कर..
ईतकं करतेस ते संपत नाही….मग राहिलेल्या अन्नाचं काय करतेस ते आठव बरं….
हे योग्य आहे का ?
शेतकरी बिचारा राब राब राबतो त्या अन्नाचा आदर कर…….
संपेल इतकच कर..
चार पदार्थ कमी केले म्हणून बाळा मी तुझ्यावर रागवेन का ग कधी ?….
मला ओळखतेस ना तू …
मग आता शहाणी हो …
खेड्यात काहीजण राहिलेलं अन्न गुरांना घालतात … गुरं पण त्या शिळ्या अन्नाला तोंड लावत नाहीत…
फार नासाडी होते ग अन्नाची …
बघवत नाही बघ…म्हणून आधीच तुला समजावून सांगायला आले आहे.
सणाची मजा घे…
हसत आनंदात साजरा कर…
यावेळेस फार छान साडी घेतली आहेस माझ्यासाठी…
आवडली बरं का…
आणि सुनबाई नी घेतलेलं नव्या पद्धतीच गळ्यातलं झकासच आहे……….
आता सजून घ्यायला तुम्हा सगळ्यांना भेटायला .. आशीर्वाद द्यायला येते की….
आणि हे बघ आईच ऐकायचं….
आईचा लेकीला सांगायचा हक्कच असतो ना…
म्हणून बाळा प्रेमानी सांगतीलं…
तशी तू हुशार, समजूतदार, शहाणी आहेसच.
आता भेटू आपण लवकरच ..
आईचं बोलणं ऐकता ऐकता माझे डोळे भरून आले होते. गौरीमाय कुठे आहे बघायला लागले….
तिला हात जोडले आणि आश्वासन दिलं…
आई तू सांगितलेलं लक्षात ठेवीन आणि तशीच वागेन ग….
आपल्या आईच सांगणं तुम्ही पण लक्षात ठेवा बरं का….
💛💛💛💛💛💛💛
सर्व गृहलक्ष्मींना समर्पित🥰