एका छोट्याश्या गावात गणपतराव नावाचे वृद्ध गृहस्थ रहात होते. त्यांनी वयाची सत्तरी ओलांडली होती पण त्यांच्या चेहऱ्यावर कायम काळजीचे सावट असायचे. त्यांची पत्नी काही वर्षांपूर्वीच देवाघरी गेली होती आणि मुलगा परदेशी स्थायिक झालेला असल्याने गणपतराव अगदी एकटे पडले होते.
दररोज सकाळी देवपूजा आणि घरातील इतर गोष्टी आवरून झाल्या की ते खिडकीतून दिसणाऱ्या रस्त्याकडे पहात बसायचे. कुणीतरी आपल्याला भेटायला येईल अशी भाबडी आशा त्यांना वाटायची. पण दिवस गेले, महिने गेले …अगदी कितीतरी वर्षही गेली पण कोणी त्यांच्याकडे आले नाही आणि ते अजूनच एकाकी झाले.
एके दिवशी ते अंगणात झाडू मारत होते. तेवढ्यात एक छोटी मुलगी …साधारणपणे आठ वर्षांची असेल ..त्यांच्याकडे आली आणि म्हणाली ” तुमच घर खूप छान आहे, मी इथे बसू थोडावेळ? “
गणपतराव थोडे आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले “अगं बाळ , बस ना. थोडावेळ का? तुला वाटेल तेवढा वेळ बस”
तिचे नाव विमल होते. त्या दिवसानंतर विमल वारंवार त्यांच्याकडे येऊ लागली. कधी त्यांच्याकडून गोष्ट ऐकायला, तर कधी त्यांना गाणं म्हणून दाखवायला तर कधी कधी त्यांच्या हातचे पोहे नाहीतर शिरा खायला..
गणपतरावांच्या शेजारी एक नवीन कुटुंब रहायला आले होते. विमल त्यांचीच मुलगी होती. तिच्या निरागस हास्याने आणि गोड बोलण्याने त्यांचे आयुष्य अगदी उजळून निघाले. आता गणपतरावांच्या चेहऱ्यावर पुन्हा हलकंफुलकं हसू दिसायला लागलं. त्यांनी त्यांच्या अंगणात छान छान झाडे लावायला सुरुवात केली . त्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा विलक्षण चमक दिसू लागली.
एके दिवशी विमल त्यांना म्हणाली ” तुम्ही खूप छान आहात आजोबा. मी तुम्हाला आजोबा म्हणाले तर चालेल ना? “
गणपतरावांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांना हेच तर हवं होत. प्रेम , स्नेह आणि कोणीतरी आपलं म्हणणार….
त्या दिवसानंतर गणपतरावांच आयुष्य बदलूनच गेलं. गावातले लोक म्हणू लागले ” काय गणपतराव काय झालं अचानक? एखादा चमत्कार झाला की काय? “
हो खरंच चमत्कारच झाला होता. पण तो एखाद्या देवाच्या मूर्तीमुळे नाही तर एक लहानश्या मुलीच्या निरागस मनाने आणि प्रेमळ शब्दांमुळे झाला होता.
डॉ मधुरिमा कुलकर्णी